अजित दादा पवार यांना बेल्हे येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली
बेल्हे | सुधाकर सैद : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात बारामती येथील विमानतळावर अपघाती निधन झाल्याने, त्यांना बेल्हे येथील मुक्ताई मंदिराच्या सभागृहात गुरुवार (दि. २९) रोजी बेल्हेवासीयांच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गावातील मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील सर्वच ग्रामस्थ भाऊक झाल्याचे दिसून आले.
यावेळी दादांच्या आठवणींना उजाळा देताना प्रत्येक जण स्वतःला आलेला अनुभव सांगताना, दादांच्या कामाचा आवाका फार मोठा होता, त्यांच्याकडे फार मोठी महत्त्वकांक्षा होती, एक तडफदार नेता होता, अशा या नेत्याला महाराष्ट्र मुकला असून महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यातही पुणे जिल्ह्यात दबदबा असणारा व जिल्ह्याच्या विकासात फार मोठी भूमिका असलेला नेता आपल्यातून निघून गेल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली.
याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत घोडके, हरिदास ताजवे, अशोक घोडके, बेल्हेचे उपसरपंच राजेंद्र पिंगट, माजी सरपंच विश्वनाथ डावखर, गोरक्षनाथ वाघ, माजी उपसरपंच निलेश कणसे, मोहन बांगर, संजय चंगेडिया, पत्रकार गणेश चोरे, सागर लामखडे, भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे डॉक्टर दत्ता खोमणे यांनी त्यांच्या कामाविषयी, स्पष्ट वक्तेपणाविषयी, कामाच्या पद्धती विषयी आपल्या श्रद्धांजलीपर भावना शब्दातून व्यक्त केल्या.
यानंतर शेवटी प्रदीप पिंगट यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत असताना त्यांचा व आमच्या परिवाराचा फार जवळचा संपर्क होता असे सांगितले. शेवटी सुशील महाराज कणसे यांनी पसायदारातून श्रद्धांजली अर्पण केली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन श्री मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकु डावखर यांनी केले. तसेच याप्रसंगी बेल्हे गावातून बहुसंख्येने मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.



